Monday, 6 February 2012

' ग्रामस्वच्छतेचा' हसतखेळत संदेश देणारी 'वेड्यांची जत्रा'

सार्वजनिक स्वच्छता हा आपल्या  रोजच्या जीवनाचा एक गंभीर प्रश्न आहे. शहरामध्ये एक वेळ हि स्वच्छता चांगली असू  शकते मात्र  ग्रामीण भागात अजूनही सार्वजनिक स्वच्छता दुर्लक्षित आहे. त्यामुळेच सरकारला 'हागणदारी मुक्ती' च्या योजना आजही राबवाया लागतात. निर्माते विश्वजित गायकवाड आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी 'वेड्यांची जत्रा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून ग्रामीण भागातील  सार्वजनिक स्वच्छता प्रश्नाकडे लक्ष्य वेधले आहे. विषय 'हागणदारी' चा आसला तरी कोठेही गालीछापाणाचा 'वास ' न येता आतिशय हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीने हा विषय सादर  करण्यात लेखक -दिग्दर्शक मिलिंद कवडे यांना चांगले यश मिळाले आहे.
 'वरची वाडी' व 'खालची वाडी' अश्या दोन 'वाड्या' मध्ये विभागलेल्या 'गाढवेवाडी' गावाची हि कथा आहे. 'वरची वाडी' चे पुढारी 'भानगडे-पाटील' व खालची वाडी' चे सरपंच कडू-पाटील यांच्यातील संघर्षामुळे गावाचा विकास तर होतच नाही उलट गावकऱ्यानी गावाच्या सीमारेषेवर आसलेल्या 'हारया' नावाच्या ( भरत जाधव) गरीब शेतकऱ्याच्या शेताचे 'हागणदारी' त रुपांतर केलेले असते. त्यामुळे वैतागलेला 'हारया' कोणती शक्कल लढवितो व केवळ आपले शेतच नव्हे तर आक्खे गाव कसे 'हागणदारी मुक्त ' करतो ते आपल्याला पडद्यावर पहावयास मिळते. 
  'वेड्यांची जत्रा' या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटात अनेक 'वेडे' पहावयास मिळतात . ग्रामीण भागातील वेड्यांचे  हे एकेक 'इरसाल नमुने ' चांगली करमणूक करून जातात. संवाद लेखक प्रकाश भागवत यांचा त्यात महत्वाचा वाटा आहे.  चित्रपटाचा विषय ' डब्या' भोवती सारखा फिरत आसला तरी त्याबाबतचे विनोद हे खालच्या पातळीवर जावू  न देण्याची त्यांनी चांगली काळजी घेतली आहे.  तर  क्यामेरामन सामला भास्कर यांनी हा चित्रपट 'प्रेक्षणीय' होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.  भरत जाधव बरोबर नायिका म्हणून काम केलेल्या स्नेहा कुलकर्णी या नवोदित अभिनेत्रीने चांगले काम  केले आहे. तसेच संदीप पाठक, पंढरीनाथ कांबळी , आनंद कारेकर , प्रकाश भागवत , सतीश तारे , विशाखा सुभेदार , आरती सोलंकी , आणि मोहन जोशी व विनय आपटे आदी 'वेड्यांनी' धमाल केली आहे. थोडक्यात हि   'वेड्यांची जत्रा' एकदा पहावयास हरकत नाही.-श्रीकांत ना. कुलकर्णी

No comments:

Post a Comment