सध्याचे देशातील सामाजिक तसेच राजकीय वातावरण इतके गढूळ झाले आहे कि, या वातावरणात कधी चांगला बदल होईल याचीच चिंता सर्वसामान्य व विचारी माणसाला लागून राहिली आहे. त्यामुळेच आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला युवकांचा देशभर उत्सफूर्त पाठींबा मिळू शकला. निर्मात्या राजश्री जगताप आणि दिग्दर्शक प्रदीप घोन्सीकर यांच्या 'चिरगुट' या नवीन मराठी चित्रपटात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न घेवून याच विषयाचा उहापोह करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये प्रत्यक्ष घटना-प्रसंगापेक्षा भाषणबाजीवर भर देण्यात आल्यामुळे केवळ एका आंदोलनात 'नवक्रांती' झालेली पहावयास मिळते. 'चिरगुट' म्हणजे 'चिंधी' परंतु अश्या अनेक चिंध्या गोळा करून त्याची 'मशाल' करता येते हि दिग्दर्शकाची कल्पना चांगली आहे. 'चिंधी' सारखे आयुष्य जगणारा सर्वसामान्य माणूस एकदा पेटून उठला कि, देशातील प्रस्थापित व्यवस्था तो बदलून टाकू शकतो हे आजपर्यंतच्या काही घटनावरून सिद्ध झाले आहे. त्याचाच आधार घेवून चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाचा नायक नाग्या उर्फ नामदेव भंडारे (उपेंद्र लिमये) हा झोपडपट्टीत राहणारा एक विद्रोही तरुण. अन्यायाविरुद्ध सतत पोटतिडीकीची भाषा बोलणारा व प्रस्थापितांना त्यांच्या तोंडावर विरोध करणारा. आपल्या तरुण मित्रांच्या सहकार्याने चळवळ उभारून ती यशस्वी करून दाखवितो. अर्थात त्याने यशस्वी केलेली हि चळवळ 'चमत्कार' वाटते कारण चित्रपटात प्रत्यक्ष कृतीपेक्षा त्याची उठसूट भाषणबाजीच दिसून येते.उपेंद्र लिमये याने नाग्या च्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. अन्यायाविरुद्ध पोटतिडीकीची भाषा बोलणारा विद्रोही तरुण त्याने चांगला उभा केला आहे. चिन्मय मांडलेकर, सिया पाटील यांनी त्याला चांगली साथ दिली आहे. चित्रपटात 'राजकारण' हि आहे परंतु कथेच्या मानाने ते फार प्रभावी वाटत नाही. कनकराज यांनी संगीतबद्ध केलेली गाणी विरंगुळा देणारी ठरली आहेत. मधु राव यांचे उत्कृष्ट छायाचित्रण हि या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे चित्रपटातील 'नवक्रांती' पाहायला सुसह्य झाली आहे.
---- श्रीकांत ना. कुलकर्णी









